Sunday, March 30, 2008

प्रश्न

टपटपणारे थेंब अन कोसळणारा पाऊस
दोनही गोष्टी कशा होणार एकत्र ?
मग नव्याचं सुख अन जुन्याचं दु:ख
हे कसं एकाच वेळी जाणवतं ?

हळुवार झुळुक आणि सोसाट्याचा वारा
एकदम अनुभवता येईल का कधी ?
पण होऊन गेलेले आनंदी क्षण
कसे आणतात डोळ्यामध्ये पाणी ?

टिमटिमणारे तारे अन पॉर्णिमेचा चंद्र
दोन्हीसुद्धा तितकेच मोहवुन टाकणारे
आपल्यासाठी टिमटिमणारा ताराच बळी देतो
तरी चंद्रावर जीव ओवाळतात सारे

काहीच ताळमेळ नाही कशाचा
तरिही सारे जुळलेले दिसते
असेच असते का जीवनसुद्धा
धागे गुंतलेले तरी त्यातच जगावेसे वाटते..!

-aditi

Sunday, March 9, 2008

नाती...

वर्तमानातल्या नात्यांचं भविष्य
का नाही वर्तमानातच दिसत ?
न सुटणारा गुंता बघत राहणं
हातात उरतं फ़क्त एवढचं..

काही नाती खुप हवीहवीशी असतात
पण कायम सोबत नाही राहत
का नाही जाउ शकत सारं बरोबर घेउन ?
प्रत्येकासाठीच्या वाटा एकच का नाही असत?

प्रत्येक वळणार्या नव्या वाटेवरती
डोळ सदैव पाणावलेलेच असतात
तीच भावना, तेच दु:ख, तोच त्रास
दरवेळी व्यक्ती मात्र बदललेल्या असतात





राहुन राहुन वाटतं नेहमीच,
पुढच्या वळणावरती हे बदलायला हवं
नवनवीन धागे रेशमी बंधांचे हे
त्यांना जपून ठेवणं जमायलाच हवं...

-aditi